पर्यटन क्षेत्राला मोठा फटका   

वृत्तवेध 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने २८ निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे. या थरारक घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. भारताचे स्वित्झर्लंड मानले जाणार्‍या या सुंदर आणि शांत अशा ठिकाणी पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला. आपल्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आनंद साजरा करण्यासाठी काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांसाठी तो दिवस शेवटचा ठरेल याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती. या हल्ल्याचा फटका काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला तसेच तिथल्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. पहलगाम खोर्‍यातील परिस्थिती नेहमीप्रमाणे सामान्य होती. पर्यटन उद्योगही जोमात होता. हॉटेल्समध्ये रेलचेल होती. दाल सरोवरावर शिकार्‍यांनी गर्दी केली होती, तर विमानतळापासून पहलगामपर्यंत सर्वत्र पर्यटक दिसत होते; पण हा भ्याड हल्ला झाला आणि काश्मीरच्या खोर्‍यात सर्वत्र शांतता आणि दहशतीचे वातावरण पसरले. जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राची वृद्धी पाहिली, तर गेल्याच वर्षी पर्यटन क्षेत्राला मोठा नफा मिळाला होता. २०१९ मध्ये कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पर्यटन अस्थिर झाले होते. त्यानंतर कोविडचाही पर्यटनाला फटका बसला होता. २०२१ पासून परिस्थितीत सुधारणा झाली होती.
 
राज्याच्या पर्यटन विभागाची आकडेवारी पाहता, २०२१ मध्ये येथे एकूण १.१३ कोटी पर्यटक आले होते. २०२२ मध्ये १.८८ कोटी आणि २०२३ मध्ये २.११ कोटींचा आकडाही गाठला होता. २०२४ मध्ये तर पर्यटकांमध्ये विक्रमी वाढ दिली २.३६ कोटी पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. त्यापैकी २७ लाख पर्यटकांनी एकट्या काश्मीरला भेट दिली होती. वाढत्या पर्यटनामुळे खोर्‍यात हॉटेल्सची मागणीही एवढी वाढली होती, की काही पर्यटकांना खासगी ‘होम स्टे’मध्ये राहण्याची सोय केली जात असे. गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम अशा ठिकाणचे पर्यटन पुन्हा बहरू लागले होते. परिणामी हॉटेल व्यवसायाला याचा मोठा फायदा होत गेला आणि वृ्द्धी होत गेली. यातच गुलमर्गचा आशियातील ‘टॉप स्की डेस्टिनेशन’मध्ये समावेश झाला. जम्मू आणि काश्मीर पर्यटन धोरण २०२०च्या माहितीनुसार, राज्यातील ‘जीएसडीपी’मध्ये पर्यटनाचा सात टक्क्यांहून अधिक वाटा आहे. २०१८-१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरचा अंदाजे जीएसडीपी १.५७ लाख कोटी होता. त्यात पर्यटनाचा थेट वाटा ११ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, २०१९-२० मध्ये पर्यटनाचा वाटा ७.८४ टक्के होता. २०२२-२३ मध्ये तो वाढून ८.४७ टक्क्यांवर पोहोचला. खोर्‍यातील हजारो कुटुंबे पर्यटन उद्योगाशी जोडलेली आहेत. सर्व शिकारा चालक, मार्गदर्शक, टॅक्सी चालक, हॉटेल कर्मचारी, रेस्टॉरंट्स, कारागीर, हस्तकला विक्रेते यांचे जीवनमान यावर अवलंबून आहे. सरकारचा अंदाज आहे, की पर्यटन क्षेत्र दरवर्षी सुमारे ५० हजार नवीन रोजगार संधी निर्माण करते. याशिवाय, पुढील १० वर्षांत ४ हजार पर्यटन सेवा देणार्‍यांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. पण सगळी स्वप्ने आता विरली आहेत.

Related Articles